लम्पीवर मात करण्यासाठी तातडीने पावले उचला;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे
लम्पीवर मात करण्यासाठी तातडीने पावले उचला;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Published on

पशुधन ही आपली संपत्ती असून त्याची जपणूक करणे आवश्यक आहे. सध्या राज्यात लम्पी आजाराने पशूंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पावले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे, असेही सांगितले.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लम्पी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल, हे लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांमध्ये जनजागृतीसाठी करावी. तसेच रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहीम राबवावी. तसेच बाधित जनावरांना औषधोपचार उपलब्ध होतील, याची काळजी घ्यावी. यासाठी संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपल्या भागात पशुपालकांच्या मदतीसाठी उपलब्ध राहावे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ देण्यात आला आहे, अशी माहितीही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in