
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू झाले आहे. मुंबईतील शिक्षकांना मुंबईत समायोजित करण्याचे काम सुरू झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील तीन महिने संघर्ष करणाऱ्या शिक्षकांना आज दिलासा मिळाला, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबई बाहेर करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला होता. मुंबई बाहेर समायोजनास शिक्षकांचा विरोध होता. परंतु शिक्षण विभाग ऐकायला तयार नव्हते. १ मे रोजी शिक्षक भारती कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कोणीही मुंबई बाहेरील समायोजन घेऊ नये, संघर्षासाठी तयार राहावे, असे आवाहन शिक्षक भारतीने केले होते. तसेच २ मे रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जमून मुंबईबाहेरील समायोजनास स्पष्ट लेखी नकार कळवला होता. शिक्षण उपसंचालक ऐकायला तयार नव्हते.
मुंबई महानगरपालिकेने तात्पुरते समायोजन करून घेण्यास सहमती दर्शवली होती. परंतु विद्यमान शिक्षक आमदारांनी मुंबई महानगरपालिकेत कायमस्वरूपी समायोजन करावे, अशी मागणी केल्यामुळे संपूर्ण समायोजन प्रक्रिया बंद पडली. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुमारे ७०० जागा रिक्त आहेत. सर्व माध्यमाच्या सर्व शिक्षकांचे तात्पुरते समायोजन मुंबई महानगरपालिकेत होऊ शकते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने समायोजनाचा कॅम्प लावला आहे.
तात्पुरते समायोजनाची केली होती मागणी
समायोजन न स्वीकारलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन तीन महिने बेकायदेशीरपणे बंद करण्यात आले होते. शिक्षक भारती संघटनेने शिक्षण उपसंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीत मुंबईतील शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील ७०० पेक्षा जास्त रिक्त पदावर तात्पुरते समायोजन करण्याची मागणी केली होती.
सर्व अतिरिक्त शिक्षकांना या कॅम्पमध्ये सहभागी व्हावे, तात्पुरत्या समायोजनाचे हमीपत्र भरून द्यावे, कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये.