Mumbai : गारगाई प्रकल्पाला ठाकरे व काँग्रेसचा विरोध; समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचा आग्रह

मुंबईला अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे याला कोणाचाच विरोध नाही. परंतु गारगाई धरण प्रकल्पात तीन लाखांहून अधिक झाडे बाधित होणार आहेत. सहा गावांचे पुनर्वसन करणार कुटुंबीयांना पालिकेच्या सेवेत नोकरी देणार याचे स्पष्टीकरण काहीच नाही.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईला अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे याला कोणाचाच विरोध नाही. परंतु गारगाई धरण प्रकल्पात तीन लाखांहून अधिक झाडे बाधित होणार आहेत. सहा गावांचे पुनर्वसन करणार कुटुंबीयांना पालिकेच्या सेवेत नोकरी देणार याचे स्पष्टीकरण काहीच नाही. भविष्यात पाऊस लांबणीवर पडला तर धरण कसे भरणार, विशेष म्हणजे गारगाई धरण प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच खर्चात वाढ होत असून भविष्यात आणखी वाढ होणार नाही, याची शाश्वती कोण देणार असा सवाल काँग्रेस व उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी केला.

दरम्यान, समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा प्रक्रिया हा प्रकल्प अधिक योग्य असून त्यातूनही ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे, असे स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यावेळी म्हणाले. गारगाई धरण प्रकल्पाबाबत सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रकल्पाचे फायदे काय, प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार, यामध्ये किती झाडे आणि गाव बाधित होणार, त्यांचे पुनर्वसन आदी माहिती बांगर यांनी स्थायी समिती सदस्यांना दिली. 

शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अमेय घोले, यामिनी जाधव, भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांनीही अनेक मुद्दे मांडले. याबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत सविस्तर चर्चा केली जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

गळती थांबवा

मुंबईकरांना अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा यासाठी आधी रोज १३०० दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते ती गळती थांबवावी, ६०० हेक्टर जमिनीवर धरण होणार तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार, पशुपक्ष्यांचे अस्तित्व मिटणार आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प खर्चात भविष्यात वाढ होणार नाही, याची शाश्वती कोण देणार, असा काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी उपस्थित केला. 

logo
marathi.freepressjournal.in