खारघर दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

यापूर्वीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली
खारघर दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे १४ श्री सेवकांचा बळी गेला. खारघरमधील ही घटना मानवनिर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे या घटनेची सत्य परिस्थिती नागरिकांसमोर येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी याप्रकरणी आपण उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यास शासनास निर्देश द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

खारघरच्या दुर्दैवी घटनेनंतर सरकारने कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सरकारने जारी केलेल्या आकड्यांबाबत संभ्रम कायम असून अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपमृत्यूची नोंद झाली नाही. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला १४ कोटी रुपये खर्च करण्यात आला, मात्र कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. सदर घटनेला जबाबदार ठरलेल्या आणि नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलिसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील राज्यपालांकडे केल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. राज्यपालांनी यावेळी खारघर घटनेबाबत सरकारशी बोलून पावलं उचलण्याचे आश्वासन दिल्याचे दानवे यांनी सांगितले.

राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, सचिन अहिर, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, मनीषा कायंदे, रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, ऋतुजा लटके, सुनील शिंदे, प्रकाश फातर्पेकर, आमश्या पाडवी, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख बबन पाटील, संपर्क प्रमुख संजय कदम आदींचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in