इंडिया आर्ट फेस्टिव्हलच्या ११ व्या पर्वाला आजपासून मुंबईतून सुरुवात

या प्रदर्शनात तैलचित्रे, अँक्रिलिक चित्रे, जलरंगातील चित्रे इत्यादी पाहायला मिळणार आहेत
इंडिया आर्ट फेस्टिव्हलच्या ११ व्या पर्वाला आजपासून मुंबईतून सुरुवात

इंडिया आर्ट फेस्टिव्हलच्या मुंबईतील ११ व्या पर्वाला आज गुरुवार १९ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. वरळी येथील नेहरू सेंटर मध्ये सुरु होणाऱ्या या पर्वामध्ये ५५० चित्र-शिल्पकार एकत्र येत असून नेहरू सेंटर येथे ५००० कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात तैलचित्रे, अँक्रिलिक चित्रे, जलरंगातील चित्रे इत्यादी पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे शिल्पे आणि ओरिजिनल प्रिंट्स, निसर्गचित्रे, फिगरेटिव्ह्ज, अँबस्ट्रॅक्ट चित्रे याप्रदर्शनात प्रामुख्याने पाहायला मिळतील. यासोबत ठिकाणी शहरातील दृश्ये, समुद्राचे रंग, शहरी व ग्रामीण प्रसंग, व्यक्तीचित्रे, न्यूड्स, सेमीन्यूड्स, धार्मिक कला, म्युरल्स, पारंपरिक चित्रे, पिचवाई कला, वारली कला इत्यादी कलाकृती रसिकांना पाहता येणार आहेत.

उदयोन्मुख, प्रस्थापित आणि दिग्गज कलाकारांनी घडविलेल्या समलकालीन कलाकृती घेण्यासाठी इंडिया आर्ट फेस्टिव्हल हा प्रमुख स्रोत असून तो महामारीनंतर दोन वर्षांनंतर पुन्हा कला रसिकांसमोर येत आहे. कलारसिक आणि कलाग्राहकांची संख्या मुंबई, बंगलोर आणि दिल्ली सारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात असून इंडिया आर्ट फेस्टिव्हलच्या वार्षिक आवृत्ती मुंबईशिवाय दिल्ली व बंगलोर येथे होत असून आर्ट फेस्टीव्हलच्या या महानगरांमधील वाढीसाठी ते मुलभूत कारण असल्याचे इंडिया आर्ट फेस्टिव्हलचे संचालक राजेंद्र यांनी सांगितले. तसेच यावर्षी इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये २० व २१ जानेवारी रोजी गिरीश शहाणे, डॉ. सरयू दोषी, प्रा.महेंद्र दामले, नियती शिंदे, अभिजीत ताम्हणे, नानक गांगुली, प्रा. इन्द्रप्रमित रॉय, बैजू पार्थन, अशा दिग्गज कला लेखक, कला इतिहासकार व कलावंतांचा समावेश असलेले परिसंवाद देखील आयोजित करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in