
मुंबई : सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करावे. ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबरोबरच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षांत समारोह आयोजित करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (ता. ७) रोजी सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीने शिकत राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम व चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे व अंमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
दीक्षान्त समारंभाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील व कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे समारंभाचे विशेष अतिथी होते. अमेरिकेच्या सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य आणि स्नातक यावेळी उपस्थित होते.
दीक्षान्त समारंभामध्ये १ लाख ६४ हजार ४६५ स्नातकांना पदव्या, ४०१ स्नातकांना पी.एचडी. तर १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
शिक्षकांची निवड सामायिक परिक्षेद्वारे
विद्यादान हे पवित्र कार्य आहे. शिक्षक पदावरील व्यक्तीची निवड गुणवत्ता व कार्यक्षमतेच्या आधारे झाली पाहिजे असे सांगताना महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आपण आग्रही आहोत. शिक्षकांची निवड करताना एक सामायिक परीक्षा देखील घेतली जावी या मताचे आपण असून या संदर्भात विचारविनिमय सुरु असल्याचे राज्यपालांनी सांगितले.