मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आई आणि वडिलांचे प्रेम, आपुलकी तसेच त्यांच्याबरोबर वेळ घालवणे आवश्यक आहे. त्यामुळे विभक्त झालेल्या पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपापसातील भांडण, राग, द्वेष बाजूला ठेवायला हवे, असे स्पष्ट करत हायकोर्टाने एका बापाला मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुलाच्या आईने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत उन्हाळी सुट्टीसाठी सात वर्षांच्या मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचा आदेश दिला.
एका जोडप्याचा २०१२मध्ये मध्ये विवाह झाल्यानतर त्यांना २०१५मध्ये पुत्ररत्न झाले. २०१६मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटासाठीचा अर्ज कुटुंब न्यायालयात प्रलंबित असताना मुलाचा ताबा आईकडे होता. मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाचा ताबा मिळण्याची परवानगी पित्याने मागितली असता, कुटुंब न्यायालयाने ती मान्य करत ५ जूनपर्यंत मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश दिले. मात्र त्याविरोधात आईने हायकोर्टात दाद मागितली असता त्या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी दोन्हीकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने कुटुंब न्यायालयाने दिलेला निकाल कायम राखला.