
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. त्या शपथेचा आदर जरूर आहे, पण त्यांनी आता केवळ शपथ घेऊन शांत न बसता मराठा आरक्षणाचा मार्ग पण सांगावा, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण, त्यांनी देखील मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन आरक्षणाचा विषय सोडवावा, असेही ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून भाजप तसेच राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. मनोज जरांगे-पाटील यांनी भाजपपासून सावध राहावे, असा इशाराही त्यांनी दिला होता. कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष चंगेज खान यांनी मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्तेकडे काही लोक प्रवेश करत आहेत, पण हे लोक सत्ता आणण्यासाठी शिवसेनेसोबत येत असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘धनगर, आदिवासी सर्व समाजांना विश्वासात घेऊन आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे. लोकसभेचे विशेष अधिवेशन देखील घेतले पाहिजे. आता मराठा आरक्षणावर जास्त बोलून गोंधळ न घालता त्यावर नेमकेपणाने बोलून मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, पण त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.