
कोरोना रुग्णसंख्या सध्या वाढत असताना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे. मात्र, अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका मात्र कायम आहे. कोरोनाची चौथी लाट जून, जुलैमध्ये येण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
लसीकरणाचे प्रमाण वाढवणे हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचेही राजेश टोपे म्हणाले. जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी चौथ्या लाटेपासून दूर राहायचे असेल तर लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
‘जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरू नये असे वाटत असेल तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढवणे राज्यासमोरील महत्त्वाचे काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचे काम करत आहे, असे टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईतील कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मुंबईतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्क्यांच्याही वर गेले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.