
एसटी महामंडळात ९२ हजार एसटी कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र वेळेत वेतन न येणे, वेतननिश्चिती नसणे, यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांची रखडलेली वेतननिश्चिती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सहा महिने प्रदीर्घ संप करून एसटी कर्मचाऱ्यांच्या हाताला काहीच ठोस मिळाले नाही. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रचंड मानहानी झाली. सध्या एसटी महामंडळ वेगवेगळ्या उपक्रमातून महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत असले तरी एसटी कर्मचारी आजही वेगवगेळ्या समस्यांतून जात आहे. शासनाने अलीकडेच दिलेली वेतनवाढ ही अनियमित व अत्यल्प असून कर्मचाऱ्यांचे पूरक भत्ते आणि अनुषंगिक सुविधांची महामंडळाने पूर्तता करणे आवशयक आहे. दरम्यान, सध्याच्या महागाईत वाढलेले घरभाडे, किराणा सामान, औषधोपचार व मुलांच्या शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. ही बाब लक्षात घेत महामंडळाने एखादा अभ्यासगट किंवा समिती नेमत त्या समितीला कालमर्यादा ठरवून देणे आवश्यक आहे.