स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळा-कडून उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात एसटीमध्ये ‘हर घर तिरंगा’ची जाहिरातीसह, बस स्थानकावर तिरंगा लावणे आणि रांगोळी तयार करून स्वच्छता मोहीम घेण्याचे आदेश एसटी महामंडळाला जारी करण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा संदेश घरोघरी पोहोचवून तो यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील जवळपास १,२५० बसवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार २५० आगारातील प्रत्येकी पाच बसवर मागील बाजूस जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक स्थानकावर फलक लावण्यात येणार असून १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक बसस्थानकाच्या दर्शनी भागात तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. ९ ते १६ ऑगस्ट यादरम्यान आगार व बसस्थानकात स्वच्छता सप्ताह पाळण्यात येणार आहे.