बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथील गीतांजली इमारत शुक्रवारी पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने काही तासांपूर्वी इमारत रिकामी करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली; मात्र मुंबईत आजही ३८७ धोकादायक इमारती असून बोरिवलीतील घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना इमारत खाली करा, असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.
मुंबईत ३८७ धोकादायक इमारती असून १२० हुन अधिक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर अनेक इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन कट करण्यात आले आहे. तरीही १५०हून अधिक धोकादायक इमारतीत रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. कुर्ला पश्चिम येथील नाईक नगर सोसायटीतील चार मजली इमारत कोसळली आणि १९ जणांचा जीव गेला. तर बोरिवली येथील दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांनी इमारत तत्काळ खाली करावी, असे निर्देश दिले.