
मुंबई : मोफत बेस्ट बस प्रवास, पगार वाढ, नादुरुस्त बसेस दुरुस्त करुनच बस आगारा बाहेर सोडाव्यात अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन पुकारले आहे. कंत्राटी कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे तब्बल एक हजार बसेस विविध बस आगारातून बाहेर न पडल्याने बेस्ट प्रवाशांचे मेगा हाल झाले. दरम्यान, संपकरी कंत्राटी कामगारांच्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.
वाढत्या महागाईमुळे १८ हजार रुपये पगार किमान २५ हजार रुपये करण्यात यावा, बेस्ट उपक्रमाच्या कायमस्वरुपी कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांना ही बेस्ट बसच्या मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी मुलुंड व घाटकोपर बस आगारातील डागा ग्रुपच्या ५०० हून अधिक कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले. दुपारी गृहराज्यमंत्री शंभू राजे देसाई यांच्याशी चर्चा केली असता कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी गुरुवारी तब्बल १२ डेपो तील डागा ग्रुप, मातेश्वरी व टाटा कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन छेडले आहे. यामुळे मुंबईतील बेस्ट बस सेवेवर परिणाम झाला असून बेस्ट प्रवाशांचे हाल सुरु आहेत.
या आगारावर परिणाम - बसेस बंदच
वरळी - ५३, प्रतीक्षा नगर - ७६, आणिक - ८२, धारावी - ७२, देवनार - ६१, शिवाजी नगर - ७९, घाटकोपर - ८२, मुलुंड - ९१, मजास - ९७, सांताक्रुझ - ८५, गोराई - ७० व मागाठाणे - ५९
कंत्राटी कंपन्या व बसेसची संख्या
मातेश्वरी - ४२२
डागा ग्रुप - ५८०
टाटा कंपनी - ३५५
ओलेक्ट्रा - ५९
हंसा - २८०
स्विच मोबॅलिटी - १२