धरणांत खडखडाट... मुंबईवर पाणी कपातीचे ढग : केवळ २६ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

धरणांत खडखडाट... मुंबईवर पाणी कपातीचे ढग : केवळ २६ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

पुढील आठवड्यात १० ते १५ टक्के पाणी कपात करण्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले

मुंबईला पाणीपुरवठा धरणांनी तळ गाठला आहे. बुधवारी सातही धरणांत फक्त ७.३९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पुढील २६ दिवस मुंबईची तहान भागेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात १० ते १५ टक्के पाणी कपात करण्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी सातही तलाव ऑगस्टपर्यंत ‘ओव्हर फ्लो’ होत असले तरी गेल्या काही वर्षांपासून लहरी हवामानामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यात जून महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह दिसत नाही. गेल्या वर्षी धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने २४ जून रोजी १० टक्के पाणी कपात करण्यात आली होती. यंदा जून महिना कोरडा गेल्याने मुंबईवर पाणी कपातीचे ढग दाटून आले आहेत. पुढील आठ दिवस धरण क्षेत्रात किती पाऊस पडेल, याचा आढावा घेणार असून त्यानंतर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, तलावांची पाणीपातळी घटल्याने मुंबईवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत भातसा आणि अप्पर वैतरणाचे राखीव कोट्यातून दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईसाठी वापरून पूर्ण क्षमतेइतका पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर - ३२८३७ (२५.३९ टक्के)

तानसा - २५८८० (१७.८४ टक्के)

मध्य वैतरणा - २०३५७ (१०.५२ टक्के)

भातसा - २०२९१ (२.८३ टक्के)

विहार - ५४६६ (१९.७३ टक्के)

तुळशी - २१२० (२६.३४ टक्के)

तीन वर्षांतील २१ जूनची स्थिती

२०२३ - १०६९८१ दशलक्ष लिटर (७.३९ टक्के)

२०२२ - १४६९७२ दशलक्ष लिटर (१९.१५ टक्के)

२०२१ - २१३९३८ दशलक्ष लिटर (१४.७८ टक्के)

logo
marathi.freepressjournal.in