
मुंबई : २०१९ मध्ये अंमली पदार्थ विरोधी प्रकरणात फसवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग-९ चे अधिकारी दया नायक यांच्याविरोधात तीन जणांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर हायकोर्टात पुढील महिन्यात सुनावणीची शक्यता आहे.
मोहम्मद शेख, मुस्तफा छारनिया व तन्वीर पर्याणी ही याचिका दाखल केली. आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दया नायक यांनी चंदनाची खेप पकडली होती. त्यात सय्यद इनायत अली यावर अब्बास मोहम्मद हा त्यातील संशयित होता. यानंतर नायक यांनी सय्यद अब्बास याच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. हा याचिकादारांचा मित्र आहे.
या प्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एसीबीने सापळा रचण्याची प्रक्रिया सुरू केली. १ मार्च २०१९ रोजी सापळा रचला. त्यावेळी कँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षा बंदोबस्तासाठी दया नायक यांची ड्युटी लावली होती. त्यामुळे सापळा रचता आला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
त्यानंतर दया नायक यांनी त्यांना अंमली पदार्थ विरोधी कायद्यातील खोट्या केसमध्ये त्यांना अडकवले. त्यानंतर नायक यांची विक्रोळीतील दहशतवादविरोधी पथकात नियुक्ती झाली.
२० सप्टेंबर २०१९ रोजी पर्याणी याला अटक करण्यात आली. तर अन्य दोन याचिकादारांना १६ ऑक्टोबर रोजी मीरा रोडला अटक झाली. मात्र, या दोघांची अटक १७ ऑक्टोबरला मुलुंडला झाल्याचे दाखवण्यात आले, असा आरोप याचिकादारांनी केला. पोलिसांनी तीन आरोपींकडून १०२२ ग्रॅम एमडी हस्तगत केले. मात्र, आमच्याकडून एमडी हस्तगत केले नाही, असा दावा त्यांनी याचिकादारांनी केला.