घराघरांमध्ये योजना पोहोचविणे हा भारत यात्रेचा ‘संकल्प’

पालकमंत्री केसरकर यांनी पालिका मुख्यालयात घेतला आढावा
घराघरांमध्ये योजना पोहोचविणे हा भारत यात्रेचा ‘संकल्प’

मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांची नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना माहिती व्हावी, त्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरात २८ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ पर्यंत ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ नियोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचविणे हा विकसित भारत संकल्प यात्रेचा संकल्प असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच शनिवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे यात्रेसाठी उपस्थित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे मुंबईतील सी विभागात माधव बाग, कावासजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर, येथे उपस्थित राहणार असल्याचेही केसरकर यांनी नमूद केले.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा पालकमंत्री केसरकर यांनी पालिका मुख्यालयात शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त रमाकांत बिरादार, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर आदींसह सहायक आयुक्त, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

समन्वय अधिकारी नेमावा

विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे वाहनांसोबत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी योजनांशी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी. तसेच ज्या विभागात यात्रा जाणार असेल, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देखील समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश मंत्री केसरकर यांनी बैठकी दरम्यान दिले.

मुंबईकरांना आवाहन

गरजू नागरिकांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी, त्यांना समजावून सांगण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आपल्या परिसरात जेव्हा ही वाहने येतील तेव्हा मुंबईकरांनी विविध योजनांची माहिती आणि लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेसोबत संपर्क अधिकारी नेमावेत असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले. योजनेची माहिती असलेली माहितीपत्रके घरोघरी वाटपासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी सूचित केले. आतापर्यंत मुंबईमध्ये ७६ ठिकाणी ही यात्रा पोहोचली असून, त्याद्वारे हजारो नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in