निकाल गुणवत्तेवर लागेल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी पूर्ण केली
निकाल गुणवत्तेवर लागेल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी/मुंबई : लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. लोकसभा आणि विधानसभेत पहिल्या दिवसापासून आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले आहे. आमचे सरकार नियमानुसार आणि घटनेनुसार स्थापन झाले असल्याने आमदार अपात्रतेबाबतचा निकाल गुणवत्तेवरच लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी पूर्ण केली आहे. या सुनावणीचा निकाल १० तारखेला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी आमदार अपात्रतेचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. आमच्याकडे असलेले बहुमत लक्षात घेता निकाल गुणवत्तेवर लागला पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. यावरून विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधले असता शिंदे यांनी या आरोपाचे खंडन केले. ईडीची यंत्रणा महाराष्ट्राच्या हातात आहे काय? असा सवाल करत तुमची चूक नाही आणि कर नसेल तर डर कशाला हवा. आमचे सरकार सूडबुद्धीने आणि राजकीय आकस ठेवून काम करत नाही. कोरोनाच्या काळात त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी बॉडीबॅग, खिचडीत पैसे खाल्ले. त्यामुळे आम्ही त्यांना कफनचोर म्हणायचे का? असा प्रश्न शिंदे यांनी केला. तुम्हाला पुराव्याशिवाय बोलण्याचा अधिकार नाही. विरोधकांनी ज्या प्रकल्पांना विरोध केला त्या प्रकल्पांना आमच्या सरकारने चालना दिली. त्यामुळे त्यांना पोटदुखी सुरू झाली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in