सलग चार तास आगीचा सामना करणार रोबोट

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सलग चार तास आगीचा सामना करणार रोबोट
Published on

आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोबो कूच करणार आहे. सलग चार तास सामना करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झुंज देणार असून, घटनेच्या ठिकाणचे फोटो पाठवणार आहे. पूर्व व पश्चिम उपनगरात दोन रोबोट दाखल होणार आहेत. यासाठी निविदा मागवल्या असून, दोन रोबोट खरेदीसाठी पालिका आठ कोटी रुपये खर्चणार आहे.

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाचे जवान जीवाची बाजी लावत दुसऱ्याचा जीव वाचवतात; मात्र आगीवर नियंत्रण मिळवताना अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याबरोबर सतत पाण्याचा मारा करणे, आपत्कालीन परिस्थितीत कठीण होते. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीला रोबोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोबोट पायऱ्यांवर चढून आगीजवळ जाऊन पाण्याचा फवारा मारू शकणार आहे. हा रोबोट रिमोट कंट्रोलने हाताळता येणार आहे. तसेच रोबोटमुळे दुर्घटनेच्या ठिकाणच्या धोक्याची तीव्रता अग्निशमन दलाला समजणार आहे. यानुसार बचावकार्य करण्यासाठी कुमक वाढवणे, यंत्रणा वाढवून वेगाने उपाययोजना करणे सोयीस्कर ठरल्याने जीवित-वित्तहानी टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in