समुद्राने रिटर्न गिफ्ट देण्यास सुरुवात,किनाऱ्यांवर १५४ मेट्रिक टन कचरा जमा

समुद्राने रिटर्न गिफ्ट देण्यास सुरुवात,किनाऱ्यांवर १५४ मेट्रिक टन कचरा जमा

या कचऱ्याची विल्हेवाट लावताना घनकचरा विभागाला नाकीनऊ आले.

मुंबईचे पावसाचे आगमन होऊन अवघा आठवडा उलटला असतानाच समुद्राने रिटर्न गिफ्ट देण्यास प्रारंभ केला आहे. मुंबईलगतच्या समुद्राला आलेल्या भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेल्या कचऱ्याने घनकचरा विभागाच्या डोक्याला चांगलाच ताप केला आहे. भरतीमुळे गेल्या दोन दिवसांत समुद्रकिनाऱ्यांवर तब्बल १५४ मेट्रिक टन कचरा जमा झाला. या कचऱ्याची विल्हेवाट लावताना घनकचरा विभागाला नाकीनऊ आले.

मुंबईत पावसाने बऱ्यापैकी जोर धरला आहे. त्यातच समुद्राला भरती येऊन उंच लाटा उसळतात. शनिवारी आणि रविवार अरबी समुद्राला मोठी भरती आली. रविवारी आलेल्या भरतीमुळे समुद्रात ४.४६ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या. या लाटांमुळे शनिवारी ९३.१८; तर रविवारी ६०.९४ मेट्रिक टन कचरा समुद्र किनाऱ्यावर फेकला गेला. यामुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल १५४.१२ मेट्रिक टनाहून अधिक कचरा किनाऱ्यावर जमा झाला.

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांत दादर येथे १५.१६, वर्सोवा येथे ९२.६८, जुहूला १५.४३, मढ येथे ८.३५, गोराईला ४.५१ इतका मेट्रिक टन कचरा जमा झाला. गिरगाव चौपाटीवर मात्र कचरा वाहून आला नसल्याचे सांगण्यात आले. इतर ठिकाणी आलेल्या कचऱ्यामुळे चौपाट्यांवर कचऱ्याचा गालिचा तयार झाला होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे कचरा उचलण्याचे काम सुरु होते, असे उपायुक्त संगीता हसनाळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in