मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली नसताना विविध दुर्घटना घडण्याची मालिका सुरु झाली आहे. १ ते ३० जून दरम्यान इमारत व इमारतींचा भाग कोसळण्याच्या तब्बल ५३ घटना घडल्या आहेत.
जून महिन्यात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये २३ जण दगावले असून ४७ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाची दमदार हजेरी लागण्यापूर्वी पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. चेंबूर येथे २३ जून रोजी भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना कुर्ला पूर्व नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळली आणि १९ जणांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईत १ ते ३० जून दरम्यान इमारतीचा भाग कोसळण्याच्या ५३ घटना घडल्या असून २३ जणांचा मृत्यू झाला तर ४७ जण जखमी झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने दिली. जून महिन्यात वीजेचा शॉक लागल्याच्या ११ घटना घडल्या.