
भारतीय रेल्वेने कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात येणारी तिकिटावरील सवलत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मागील काही महिन्यांपासून सर्वकाही सुरळीत सुरु असताना ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटावरील सवलतीबाबत पुन्हा सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी ज्येष्ठ प्रवासी तसेच रेल्वे प्रवासी संघणतणनाकडून करण्यात आली होती. परंतु रेल्वे प्रशासनाने ही सवलत अद्याप सुरू केलेली नसल्याने त्याचा फटका ज्येष्ठ प्रवाशांना बसत आहे.
कोरोनाकाळात अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर या गाड्या सुरू करण्यात आल्या.
या गाड्यांमध्ये आरक्षित प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाकडून मुभा देण्यात आली. मात्र सवलतीने प्रवास करणारे व पासधारक यांना सर्व गाड्यांमध्ये मज्जाव करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशातील सर्व गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या. त्याचबरोबर पासधारक व नियमित तिकीटे काढून जाणाऱ्या प्रवाशांनाही मुभा देण्यात आली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून सर्वकाही सुरळीत करण्यात येत असतानाच ज्येष्ठ नागरिकांना मात्र सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले.
रेल्वेने काही मार्गांवर खासगी गाड्या सुरू केल्या. त्यातही कुठलीच सवलत देण्यात आली नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी रेल्वे शंभर टक्के क्षमतेने सुरू असताना ज्येष्ठांचीच सवलत बंद का करण्यात आली असा सवाल ज्येष्ठ प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनांकडून विचारण्यात येत आहे.
‘आम्हाला तिकीट
सवलत का नाही?’
कोरोनापूर्वी ६० वर्षांवरील पुरुषांना ४० टक्के, तर ५८ वर्षांवरील महिलांना ५० टक्के सवलत रेल्वे प्रशासनाकडून तिकिटी दरात देण्यात येत होती. सद्यस्थितीत रेल्वे प्रशासनाने दिव्यांग, ११ प्रकारचे आजार असलेले पेशंट आणि विद्यार्थ्यांना रेल्वे तिकीट दरातील सूट पुन्हा लागू केली आहे. मग ज्येष्ठ नागरिकांना सवलत का लागू करण्यात आली नाही अशी खंत ज्येष्ठ प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.