
मुंबई : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने केंद्र सरकारने पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी ट्विटद्वारे दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या ३ ऑगस्टपर्यंत एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख होती. आजपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील २४ तासांत ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे, मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे आणि तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पीक विम्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार केंद्राने तीन दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. मुदतवाढ मिळाल्याने आता उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.