चेंबूर येथील अपघातात तीन मित्रांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र

चेंबूर येथील अपघातात तीन मित्रांचा मृत्यू

चेंबूरहून वाशीनाका येथे भरधाव कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले.
Published on

मुंबई : चेंबूरहून वाशीनाका येथे भरधाव कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. हरिश्चंदन दिलीप दास, प्रमोद शंकर प्रसाद आणि हुसैन शेख अशी मृतांची नावे आहेत, तर जावेद सैफला खान, मनोज मनी करंटम आणि संजय सुखर सिंग हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी जावेद खान या चालकाविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून तिघांच्या मृत्यूस तर स्वत:सह इतर दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात रविवारी दुपारी पावणेदोन वाजता चेंबूर येथील गव्हाणपाडाकडून वाशीनाकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर झाला. या दुर्घटनेतील जखमी व मृत लक्ष्मीनगरातील एकाच परिसरात राहतात. रविवारी दुपारी ते जावेदच्या कारमधून गव्हाणपाडा येथून वाशीनाकाच्या दिशेने येत होते. यावेळी भरधाव कार चालविताना जावेदचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पलटी होऊन उभ्या असलेल्या एका टँकरवर आदळली. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले होते. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

जखमींना राजावाडीसह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यातील प्रमोद हा मूळचा बिहारचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी कारचालक जावेदविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in