

वसई : वसईतील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न अधिकच जटील होत चालला असून यातून निघणाऱ्या धुरामुळे वसई विरार शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. महापालिका याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. या कचऱ्याच्या ढिगाला लागणाऱ्या आगीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
या धुरामुळे भोयदापाडा, वालीव, सातिवली, वाघराळपाडा, राजीवली, मधुबन या भागातील लोकांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता ही समस्या अधिकच तीव्र होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. या प्रकरणी त्वरित दखल घेऊन उपाययोजना न केल्यास लवकरच गावकरी हजारोच्या संख्येने महानगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले.
महानगरपालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असून टक्केवारी मिळत नसल्याने या प्रकल्पातील कचरा वर्गीकरण रखडले असल्याचे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. या डंपिंग प्रकल्पामुळे या भागातील करदाते नागरिक काय नरक यातना भोगत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी वसई विरार शहर महापालिकेच्या आयुक्तांचा यांचा बंगला भोयदापाडा गावात बांधण्यात अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.