दहीहंडीचा सराव करताना बालगोविंदाचा दुर्दैवी अंत; सहाव्या थरावरून कोसळून मृत्यू

दहिसरच्या केतकीपाडा येथे दहीहंडीचा सराव सुरू असताना सहाव्या थरावरून कोसळून एका ११ वर्षीय बालगोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री महेश रमेश जाधव (११) हा बालगोविंदा नवतरुण मित्र मंडळ पथकासोबत दहीहंडीचा सराव करत असताना...
दहीहंडीचा सराव करताना बालगोविंदाचा दुर्दैवी अंत; सहाव्या थरावरून कोसळून मृत्यू
Published on

मुंबई : दहिसरच्या केतकीपाडा येथे दहीहंडीचा सराव सुरू असताना सहाव्या थरावरून कोसळून एका ११ वर्षीय बालगोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री महेश रमेश जाधव (११) हा बालगोविंदा नवतरुण मित्र मंडळ पथकासोबत दहीहंडीचा सराव करत असताना, तोल जाऊन खाली पडला. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे नवतरुण मित्रमंडळाचे पथक गोविंदाचा सराव करत होते. या पथकात महेश रमेश जाधव (११) हा चिमुकला ६व्या थरावर चढला होता. रात्री पावणेदहाच्या सुमारास तो उंचावरून कोसळला आणि त्याला झेलण्याच्या आत तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी दहिसर पूर्वेच्या प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, महेशला उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, चिमुरड्या गोविंदांचा जीव धोक्यात घालणाऱ्या सराव पद्धतीतील बेजबाबदारपणावर टीका होत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. सराव करताना मंडळाने सुरक्षा उपाययोजना राबवणे आवश्यक होते. मात्र, आयोजकांनी सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले, असे पोलिसांनी सांगितले.

मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करून वर्चस्वाची हंडी फोडण्यासाठी राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. मात्र, शनिवार १६ ऑगस्टला रंगणाऱ्या दहिहंडीआधीच चिमुकल्याचा जीव गेल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in