रेल्वे तिकीट म्हणजे रेल्वेची मालकी नव्हे!

अलीकडेच रेल्वे डब्यांत सीटवर पाय ठेवत राजेशाहीमध्ये बसण्याच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे.
रेल्वे तिकीट म्हणजे रेल्वेची मालकी नव्हे!

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये दिवसागणिक प्रवासी संख्या वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्या प्रवासी संख्येच्या दुप्पट बेशिस्तीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रेल्वे स्थानके, रेल्वेमध्ये स्वच्छता पाळा, थुंकू नका, सीटवर पाय ठेवून बसू नका अशा उद्घोषणा, पोस्टर, डब्यात लिहण्यात आले असले तरी काही बेशिस्त प्रवाशांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.

अलीकडेच रेल्वे डब्यांत सीटवर पाय ठेवत राजेशाहीमध्ये बसण्याच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. आजूबाजूला कोणी बघत नसल्याने यातील काही महाशय चक्क आपले हातपाय पसरत सीटवर अंगच टाकून देताना पाहायला मिळतात. तर बहुतांश रेल्वेमधील दिव्यांग डब्यात खोटेनाटे आजारपण सांगत काही प्रवासी सीटवर झोपलेले आढळतात. दरम्यान, काही सुजाण प्रवाशांकडून या अशा बेशिस्त प्रवाशांना हटकण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ‘रेल्वे तिकीट काढली आहे, बसेल नाही तर झोपेल’ अशी उत्तरे देण्यात येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.  

रेल्वेमध्ये प्रवासी संख्या वाढत असताना गर्दीत एकाबाजूला उभे राहायला मिळाले तरी काही प्रवासी धान्य होतात. मात्र दुसऱ्या बाजूला काही प्रवासी रेल्वे आपली मालमत्ताच असल्याचे दर्शवत राजरोसपणे बेशिस्तीचे दर्शन घडवताना दिसतात. रेल्वे प्रवासात खाल्लेल्या वस्तूंचा कचरा सीटखाली टाकणे, तंबाखू-गुटखा-माव्याचा बकाणा रेल्वे दरवाजातून अथवा खिडकीतून थुंकणे, आपल्या चप्पल-बुटांसह सीटवर पाय ठेवून बसणे-झोपणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी अशा बेशिस्त प्रवाशांविरोधात 'नेटकरी' पुढे सरसावले होते. संबंधितांचे फोटो-व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले जात होते. मात्र कोरोनाकाळात बंद असलेल्या रेल्वेसेवा आणि त्यानंतर अद्याप काही प्रमाणात सुरु असणारे वर्कफ्रोम होम यामुळे नेटकऱ्यांनी काहीसे याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या बेशिस्तीचा त्रास इतर प्रवाशांना सहन करावा लागत आहे. कारण हे बेशिस्त प्रवासी ज्या सीटवर चप्पल-बुटांसह पाय ठेवून बसत असतात, त्या जागेवर दुसरा कुणीतरी प्रवासी येऊन बसत असतो. तेव्हा त्याचे कपडे खराब होतात तर बऱ्याच वेळेला त्यांच्या आडमुठेपणामुळे इतर प्रावाशांना त्याजागी बसता येत नाही.

रेल्वेने प्रवास करताना आपली काही जबाबदारी आहे, ती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. सीटवर पाय ठेवू नये हे सांगण्याची गरज का पडावी? प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन तसेच दंडात्मक कारवाई करूनही बेशिस्तीचे वारंवार दर्शन घडत आहे, ही गंभीर बाब आहे. आमची अशा बेशिस्त प्रवाशांविरोधात कारवाईची मोहीम सुरु असून पुन्हा आम्ही आवाहन करतो की, रेल्वे प्रवासात, स्थानकावर थुंकू नका, सीटवर पाय ठेवून बसू नका. अन्यथा कठोर कारवाई करावी लागेल.  

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in