पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे व झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याकडे खाजगी अस्थापनांनी दुर्लक्ष केल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्याने दिली. मुंबई शहर व दोन्ही उपनगरात तब्बल ७०० झाडे व झाडांच्या फांद्या धोकादायक स्थितीत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी झाडांची छाटणी व कापणी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, अस्थापनांनी दुर्लक्ष केल्याने मुंबईकरांचा जीव धोक्यात असून विविध अस्थापनांच्या जागेत मृत्यूची टांगती तलवार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण ३० लाख वृक्ष आहेत. त्यापैकी मान्सूनपूर्व कामांतर्गत १५ जूनपर्यंत सर्व झाडांची पाहणी करून मृत व धोकादायक वृक्षाची छाटणी/ कापणी करण्यात आलेली आहे. ३० लाख वृक्षांपैकी १,९२ हजार झाडे मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावर आहेत. त्यापैकी दिड लाख वृक्षांची छाटणी/ कापणी करण्यात आली आहे. तर यात एकूण ५२३ झाडे मृत/धोकादायक स्थितीत होती, जी मान्सुनपूर्व काढण्यात आलेली आहेत. खबरदारीची बाब म्हणून सुमारे ९ हजार सोसायटींना आपआपल्या सोसायटीतील झाडांची छाटणी/ कापणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. पालिकेच्या आदेशानंतर ९ हजार सोसायटयांपैकी ८३०० सोसायटींनी सोसायटीतील झाडांची कापणी/छाटणी करून घेतली आहे.
मात्र, ७०० झाड व झाडांच्या फांद्यांची छाटणी न झाल्याने पावसाळ्यात दुर्घटना होण्याची शक्यता असून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.