बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील त्रिकुटाला अटक; १० बाईक जप्त

बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील त्रिकुटाला अटक; १० बाईक जप्त

या कारवाईदरम्यान यश कोठारी पळून गेला होता. पळून गेलेल्या आरोपीस काही तासांत पोलिसांनी अटक केली.

मुंबई : बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील एका त्रिकुटाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. मिलिंद मनोहर सावंत, यश दीपक कोठारी आणि अरविंद राजन गडकरी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही बोरिवली आणि कांदिवलीतील रहिवासी आहेत. त्यांच्या अटकेने १० बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यांतील १० बाईक पोलिसांनी जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले. १७ फेब्रुवारीला बोरिवली परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या मिलिंद सावंत आणि अरविंद गडकरी या दोघांना गस्त घालणाऱ्या बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली होती. या कारवाईदरम्यान यश कोठारी पळून गेला होता. पळून गेलेल्या आरोपीस काही तासांत पोलिसांनी अटक केली. या तिघांची पोलिसांनी चौकशी केली असता, ते सराईत बाईक चोर असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या अटकेने बाईक चोरीच्या दहाहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याविरुद्ध बोरिवली, विक्रोळी, एमआयडीसी, कस्तुरबा मार्ग, कुरार, दिडोंशी, वाकोला पोलीस ठाण्यात बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. चोरी केलेल्या काही बाईक त्यांनी पुण्यातील वारंजे येथे ठेवल्या होत्या. या चारही बाईक नंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. मिलिंदविरुद्ध मुंबईसह ठाण्यात १९, यशविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात १४ तर अरविंदविरुद्ध ३ गुन्ह्यांची नोंद आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in