
मुंबई : कांदिवली आणि साकिनाका येथे बुधवारी दिवसभरात झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यात एका ८१ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह १९ वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. याप्रकरणी साकिनाका आणि समतानगर पोलिसांनी दोन बसचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून दोन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत एका बसचालकास समतानगर पोलिसांनी अटक केली, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. चतुरादेवी जैस्वाल आणि उत्कर्ष शर्मा अशी या दोन मृतांची नावे आहेत. पहिला अपघात साकिनाका येथील अंधेरी-कुर्ला रोड येथे झाला. चतुरादेवी बुधवारी बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना बेस्ट बसने धडक दिली होती. अपघातात त्या गंभीररीत्या जखमी झाल्याने स्थानिक रहिवाशांनी तिला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या अपघातात उत्कर्ष रविंद्र शर्मा या १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. उत्कर्ष हा त्याच्या मित्रांसोबत बाईकवरून मिरारोडच्या दिशेने जात होता. कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बाईक स्लीप होऊन उत्कर्ष हा बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.