
मुंबई : बेस्ट बस कंडक्टरवर हल्ला करणाऱ्या दोघांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. दोघांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि प्रत्येकी ७५,००० रुपये दंड ठोठावला. आरोपी रिक्षाचालकाने बस कंडक्टरवर हल्ला केला होता. डिसेंबर २०१२ मध्ये वांद्रे परिसरात ही घटना घडली होती.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी दोघा हल्लेखोरांना शिक्षा सुनावत दणका दिला. आरोपींकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेपैकी ५०,००० रुपये पीडित मनोहर रामचंद खत्री यांना भरपाई म्हणून देण्याचे तसेच ५०,००० रुपये बेस्ट महाव्यवस्थापकांना देण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, १५ डिसेंबर २०१२ रोजी प्रतीक्षानगर आणि सांताक्रुझ रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या बस क्रमांक ३१५ च्या कंडक्टरवर हल्ला झाला होता. सकाळी वांद्रेजवळ रिक्षाचालक शौहरब अली रुस्तम अली हाश्मीने बेस्टची बस अडवली. यावेळी चालक चंद्रशेखर सोनसुरकर यांनी हाश्मीला रिक्षा बाजूला करण्यास सांगितले.