मुंबई वाचविण्यासाठी उद्धव-राज एकत्र; संजय राऊत यांचा दावा

मुंबई वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकर एकत्र येत आहेत, युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. मुख्य म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर इंडिया आघाडीतील कोणाचाही आक्षेप नाही, असा दावा शिवसेना खासदार (उबाठा) संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत
संजय राऊतसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकर एकत्र येत आहेत, युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. मुख्य म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर इंडिया आघाडीतील कोणाचाही आक्षेप नाही, असा दावा शिवसेना खासदार (उबाठा) संजय राऊत यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, ठाकरे बंधू मराठीची अस्मिता, हिंदीची सक्ती आणि मराठीच्या प्रश्नावर एकत्रआले आहेत आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. उद्धव व राज ठाकरे यांनी ठरविले असेल तर तीच भूमिका राज्यातील मराठीप्रेमींची आहे. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही.

संजय राऊत यांनी दिल्लीतील बैठकीत काय घडले हे सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले की, दोन बंधू मराठीच्या प्रश्नावर एकत्र येत असतील तर कोणाला काय समस्या असेल आणि याबद्दल दिल्लीमध्ये चर्चा करण्याचा काही विषय नाही. कारण स्थानिक पातळीवर दोन बंधू एकत्र येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हा इंडिया आघाडीचा विषय नाही. परप्रांतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांची कोणतीही भूमिका नाही. मराठी कोणी बोलणार नाही, म्हटल्यावर भडका उडतो, असे राऊत म्हणाले.

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत महाविकास आघाडीत कोणालाही आक्षेप नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अद्याप कोणतीही आघाडी नाही. आम्ही दिल्लीत जातो, आम्ही आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीत जातो. कोणाची लाचारी पत्कारून आम्ही दिल्लीत जात नाहीत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. जो लाचारांचा गट होता, तो तुमच्यासोबत आहे, जे शेपट्या हालवत तुमच्यामागे दिल्लीत फिरतात, यामुळे फडणवीसांनी आम्हाला स्वाभिमानाचा विषय सांगू नये, असेही राऊत म्हणाले.

कोणत्याही संघर्षासाठी तयारी

आमची कोणत्याही संघर्षासाठी तयारी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच कार्यक्रमाला वरळीत हजेरी लावली, यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आमचे त्यावर लक्ष होते. पण आम्ही कोणत्याही संघर्षासाठी आता तयार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हणत थेट मोठा इशाराच दिला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील आमचा लढा कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले. आम्ही राहुल गांधी यांच्याकडून आशावादी आहोत, असेही त्यांनी म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in