

मुंबई : दिल्लीमध्ये जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार आंदोलने होत आहेत. मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'तिरंगा मोर्चा'ला तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या मोर्चाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याने शिवाजी पार्क परिसरात जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या फोनवरुन अभिजित दिपके यांनी मुंबईतील तरुणाईसोबत संवाद साधला.
शिवाजी पार्कवर तरुणाई एकवटली होती. या मोर्चामध्ये संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला ललकारले. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही.
तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तुमच्यासमोर तिरंगा घेऊन आहोत. बघतो तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही’. दिल्लीत ज्या बेधुंद पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, अश्रुधूर सोडण्यात आला, त्याचा मी तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले.
तरुणाईचा एल्गार
नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीमुळे संतप्त झालेले हजारो विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर जमली होती. तरुणांकडून तिरंगा हाती घेत राष्ट्रगीत गायन केले.
या मोर्चाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून अनेक प्रमुख नेते आणि सामाजिक व्यक्ती विद्यार्थ्यांनी काढलेल्या या आक्रोशात सामील झाल्या.
गांधी, आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केलाय...
दरम्यान, या मोर्चासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, शर्मिला ठाकरे हे नेते ही सुद्धा उपस्थित होते. तुषार गांधी, अभिनेता अतुल कुलकर्णी सुद्धा तिरंगा मोर्चात सामील झाले होते. दरम्यान, अतुल कुलकर्णींची फेसबुक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल, 'या चळवळीच्या माध्यमातून, आजच्या पिढीने गांधी आणि आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केलाय...
उद्या ‘तिरंगा मार्च’
दरम्यान, अशाच पद्धतीने रविवारी २६ जुलैला तिरंगा मार्च काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघणारा हा मोर्चा सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पोहोचेल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय भाषण होणार नाही, कोणताही राजकीय फलक नसेल, कुठलेही पॉलिटिकल बॅनर नसतील, फक्त आपण देशभक्तीसाठी तिरंगा पुढे घेऊन चाललो असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.