काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यात भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. आपल्या पक्षाला सावरकरांबद्दल नितांत आदर असून, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे आपण समर्थन करत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, "राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या टिप्पणीचे आम्ही समर्थन करत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आपल्याला नितांत आदर आणि श्रद्धा आहे, जी पुसली जाऊ शकत नाही." असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, पुढे त्यांनी, "भाजपने याबाबत राजकारण करू नये. सावरकरांना केंद्र सरकारने अद्याप भारतरत्न का दिला नाही?" असा टोलादेखील लगावला.
खासदार राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा ही सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. अशामध्ये मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला हजेरी लावली होती. तसेच, या यात्रेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे.