

मुंबई : आपल्या इकडे महिलांचे विनयभंग होत आहेत. ड्रग्जची प्रकरणे बाहेर येत आहेत. तरीही आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकडे बंगालमध्ये जातात कारण त्यांना बंगाल जिंकायचा आहे. त्यासाठी दोन लाख 'सीआरपीएफ'चे जवान तिकडे उतरवले आहेत. पश्चिम बंगालमध्ये वाघीण एकटीच लढतेय, त्या जिंकल्याच पाहिजेत, असे स्पष्ट करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत भाजपवर निशाणा साधला.
शिवसेनेच्या नेतृत्वाखालील भारतीय कामगार सेनेची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृहात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एखाद्या संघटनेने ५८ वर्षे नेतृत्व करणे येड्या गबाळ्याचे काम नाही, असे सांगत दिवंगत नेते दत्ताजी साळवी यांच्या आठवणीना उजाळा दिला. दत्ताजी साळवी यांनी संघटनेचे काम करण्यासाठी आपली नोकरी सोडली. त्यांनी केलेल्या कामामुळे हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या, असे ठाकरे म्हणाले.
लोक येतात जातात त्यांची कर्म त्यांच्यासोबत जातात. ज्यांना जायचे असेल त्यांनी जरूर जा, पण जे गेलेत त्यांचे काय झालेय हे त्यांना विचारा. माणसे विकली जात आहेत. युनियन क्षेत्रात दुकानदारी सुरू आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी कामगार क्षेत्रातील सद्यस्थितीवर भाष्य केले. अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे, ते लेझीमसारखे चालू आहे. दुबईमध्ये उत्तर भारतीय काम करत आहेत, अशी बातमी आहे. देश म्हणतोय परत या... पण मेलो तरी चालेल काम सोडून माझ्या देशात जाणार नाही. असे ते कामगार का म्हणताहेत, असे ठाकरे म्हणाले.
आम्ही हिंदू आहोत, बुरखे काय फाडणार?
नारी शक्ती विधेयकावरून गदारोळ सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांचे बुरखे फाडणार. अरे आम्ही हिंदू आहोत, बुरखे काय फाडणार? मुख्यमंत्री लोकसभेत होते का, असा सवाल ठाकरे यांनी केला. महिला आरक्षणाबद्दल एवढा कळवळा असेल तर संसदेचे उद्घाटन करताना आणि अयोध्या राम मंदिरावेळी राष्ट्रपतींना का बोलावले नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून का? महिला आरक्षण लागू करा मी आजसुद्धा म्हणतो. हा नवा विषय नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.