बंडखोरांचा बीमोड करण्यासाठी उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे ५५ आमदारांपैकी ३९ आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. ठाणे, पालघर, नवी मुंबईतील अनेक नगरपालिका, महापालिकांचे जवळपास सर्वच नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. शिवसेनेला लागलेली ही गळती थांबवण्यासाठी व बंडखोरांचा बीमोड करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे आता लवकरच पक्षाला नवीन उभारी देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. यासाठी ते लवकरच संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. पक्षाची गढी मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आता स्वत: मैदानात उतरणार आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान ते अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळावे घेणार आहेत. शिवसेनेला नवसंजीवनी देण्याचे आणि पुन्हा पूर्वीचे आक्रमक रूप देण्याचे ध्येय उद्धव ठाकरे यांनी निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. शिंदेंच्या बंडापासून उद्धव ठाकरे दररोज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. ज्यांना जायचे त्यांनी जावे, असे त्यांनी रोखठोकपणे सांगितले आहे. तसेच नव्याने पक्ष संघटन उभारणार, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.