उद्धव ठाकरे पुन्हा भरारी घेणार?

उद्धव ठाकरे यांचे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील कोणीही सरकारी पद भूषवणार नाही
उद्धव ठाकरे पुन्हा भरारी घेणार?
PM

एस. बालकृष्णन/मुंबई : शिवसेना (उबाठा) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकारणात एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आता त्यांचा पक्ष, नाव व चिन्ह आदींवर शिंदे यांचेच वर्चस्व असल्याचे शिक्कामोर्तब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजकारणात टिकायला मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यांचा विजीगिषू स्वभाव पाहता ते पुन्हा भरारी घेतील, असा विश्वास शिवसैनिकांना वाटत आहे.

उद्धव ठाकरे यांचे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील कोणीही सरकारी पद भूषवणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच उद्धव यांना संधी देणे शक्य असतानाही बाळासाहेबांनी मनोहर जोशी, नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पण, त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही हे पद भूषवले नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना त्यांच्यावर मुख्यमंत्री होण्यासाठी मोठा दबाव आला. पण, त्यांच्या काळात कोविडची जागतिक महासाथ आली. ती निस्तरण्यात त्यांचा मोठा वेळ गेला. कोविडच्या निर्बंध काळात ते वांद्रे येथील घरातूनच सरकार चालवत होते. कोविड काळ संपताना ते काम सुरू करणार होते, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने त्यांचे सरकार पाडले.त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला दिसून येईल

सध्या राजकारणात सर्व बाजूंनी अडचणीत आलेले उद्धव ठाकरे हे लढवय्ये आहेत. संघर्षात ते अधिक चमकून उठतात. ते भक्कम मनाचे असून महाराष्ट्राला येत्या काळात त्याची प्रचिती येईल, असे एका शाखाप्रमुखाने ‘नवशक्ति’ला सांगितले.

निवडणुकीत ठाकरे यांच्या आडनावाचा करिष्मा दिसून येईल. कारण अजूनही ठाकरे यांच्या नावाची सर्वसामान्य माणसांवर जादू कायम आहे. कोट्यवधी महाराष्ट्रीयन माणसांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपुलकी आहे. त्याचा मोठा फायदा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो. त्यामुळे उद्धव हे शिंदे व भाजपला सतत मुंबई मनपाच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान देत आहेत. त्यांच्या वारंवार होणाऱ्या राजकीय अपमानामुळे केवळ मनपा निवडणुकाच नव्हे, तर संसद आणि विधानसभेच्या निवडणुकाही जिंकण्याचा सेनेचा निर्धार आणखी वाढला आहे. कारण जनतेच्या सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे. भाजपकडून ‘ईडी’ची सतत धमकी दिली जात असल्याने शिवसेनेचे काही नेते भाजपच्या आश्रयाला गेले आहेत. मात्र, उर्वरित नेते जे ईडीला घाबरत नाहीत. उद्धव यांना ताब्यात ठेवण्यासाठी भाजपकडे काही युक्त्या आहेत हे खरे आहे, पण सध्या उद्धव हे संघर्षाच्या मूडमध्ये आहेत.

निवडणूक आयोगाकडून धक्का

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांनाही मोठा धक्का दिला. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. तसेच शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे म्हटले, तर १० फेब्रुवारीला ठाकरे यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आणखी मोठा धक्का दिला. शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. त्यामुळे अनेक राजकीय निरीक्षकांना धक्काच बसला. या सगळ्या घडामोडी म्हणजे उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आल्याचे दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in