Uddhav Thackeray's challenge to BJP: उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान; म्हणाले, "हिंमत असेल तर..."
गेल्या काही दिवसांआधी पाच राज्यांचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपाला तीन राज्यात भरभरून यश प्राप्त झालं. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला खुले आव्हान दिलं आहे. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे देखील ते या वेळी म्हणाले. सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबरला धारवीहून अदाणींच्या कार्यालायवर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
उद्धव ठाकरे पुढं बोलताना म्हणाले की, धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे फार गरजेच आहे. 400 ते 500 फुटांची जागा मिळायला हवी. 80 ते 90 हजार झोपड्या अद्याप पात्र-अपात्रतेच्या सीमेवर आहेत. मला आता अदाणी यांना विचाराचे आहे की, तुम्ही काय करणार आहात? सरकार उद्योगपतीला मदत करत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासीय राहत आहेत त्या ठिकाणी धारावी वासियांना राहायला मिळायला हवे, यासोबतच पोलीस, सफाई कर्मचारी यांना देखील राहायला संधी मिळायला हवी.
टीडीआर कडक करणार असाल तर मग त्याचा सरकारला अधिकार का देता? सरकारने ते आपल्याजवळ घ्यायला हवे. अदाणी याचे भले कसे होईल असा सरकारने प्लॅन केला आहे. जर टीडीआर हा विषय समोर येणार असेल तर सरकारने ते आपल्या ताब्यात घ्यायला हवे. 20 टक्के सरकार आणि 80 टक्के अदानी असा विषय सध्या महाराष्ट्रात सुरु झाला आहे. याबद्दल देखील खुलासा व्हायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईतील धारावीचा विकास झालाच पाहिजे आणि ही शिवसेनेची भूमिका आहे. धारावी विकासांच्या कामाबद्दल संशय येत आहे. धारावीच्या गलिच्छ वस्तीला सोन्याचा भाव आला आहे. तेथील व्यवसायिकांना देखील जागा मिळाल्या पाहिजे. विकास कामांमुळे मुंबईकरांचा श्वास घुसमटला आहे. नियोजन शून्य कामांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सरकार केवळ कंत्राट काढत आहे. हे कॉन्ट्रॅक्ट सरकार आहे. अभ्युदय नगर बांद्रा रिक्लेमेशन हे देखील अदानीला देण्यात येणार असल्याची माहिती मिळली आहे. केवळ अदानीसाठी सगळं करत आहेत, त्यामुळेच 16 तारखेला शिवसेनचा भव्य मोर्चा अदानीचा ऑफिसवर काढण्यात येईल. मुंबईला संपवण्याचे काम कोणीही करू नये, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.