ऐन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल ८०० कंत्राटी चालकांचा वापर कमी होत असल्याने शनिवार, ३ सप्टेंबरपासून त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. संप काळात याच कंत्राटी चालकांनी एसटी सेवा सुरळीत ठेवली होती; मात्र त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करा, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी संप पुकारला होता. जवळपास सहा महिने एसटी कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक सेवा खोळंबली होती. दरम्यान, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता संपकाळात एसटी महामंडळाने ८०० चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली. एप्रिल २०२२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने सर्व चालक-वाहक कामावर रुजू झाले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम कमी झाले. मात्र, त्यानंतरही कंत्राटी चालकांची मुदत वाढवण्यात येत होती.