उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत

सोमवारी सकाळी पालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानात या सख्ख्या चिमुकल्या भावांचा उघड्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत

मुंबई : वडाळा पूर्व येथील पालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूने वडाळा परिसरावर शोककळा पसरली आहे.

वडाळा, पूर्व येथे राहणारे अंकुश वागरे (४) व अर्जुन वागरे (५) हे दोघे चिमुकले रविवार, १७ मार्चपासून बेपत्ता होते. मात्र, सोमवारी सकाळी पालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानात या सख्ख्या चिमुकल्या भावांचा उघड्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

या घटनेने या मुलांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. महर्षी कर्वे उद्यान येथील पाण्याची टाकी पातळ प्लास्टिकने झाकून ठेवलेली होती. त्यामुळे अर्जुन आणि अंकुश हे या पाण्याच्या टाकीत पडले, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, ही दोन्ही मुले बेपत्ता असल्याने रविवारपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर ते सोमवारी सकाळी या पाण्याच्या टाकीत आढळून आले. या घटनेने पालिकेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला असून त्यामुळे एका कुटुंबाला आपली दोन मुले हकनाक गमवावी लागल्याने येथील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in