मुंबई : मलजल वाहून नेण्यासाठी पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे विस्तारले आहे. परंतु या पर्जन्य जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असल्याने त्या जीर्ण झाल्याने त्या बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पर्जन्य जल वाहिन्या टिकाऊ व मजबूत राहाव्यात यासाठी आता जीओपॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ४१६ कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबई शहरातील या पर्जन्य जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्यातून घाण पाणी रस्त्यावर येते आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ब्रिटीशकालीन मलजल वाहिन्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जीओपॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून पर्जन्य जलवाहिन्यांना आतून कोटींग करण्यात येणार आहे. यामुळे पर्जन्य जलवाहिन्या सुमारे ४० वर्षे मजबूतीने टिकतील, यासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ब्रिटीशांनी टाकलेले शहर भागात मलनि:सारण वाहिन्या आणि पर्जन्य जलवाहिन्या जाळे अजूनही अस्तित्वात आहे; मात्र ते जाळे आता जीर्ण झाले आहे. मुंबईचा उपनगरात झपाट्याने विकास झाला, मात्र पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिःसारण वाहिन्यांचा विस्तार झालेला नाही. ब्रिटिशांनी नियोजन करून शहर बांधले, त्यामुळे मलनिःसारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे तयार केले; मात्र लोकवस्ती वाढली. उपनगर विस्तारत गेले. त्याचे नियोजन झाले नाही. त्यामुळे चितळे समितीच्या शिफारशीनुसार ब्रिमस्टोवॅड प्रकल्प राबविण्यात येत आहे.