उत्तनच्या मच्छीमारांना हवा स्वतंत्र मासळी बाजार; मच्छीमारांना दलालांच्या लुटीतून हवी मुक्तता

भाईंदर आणि नायगाव येथील घाऊक मासळी बाजारात दलालांची मनमानी वाढत असून, मच्छीमारांची सर्रास लूट होत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात आला आहे. दलालांच्या कात्रीतून सुटका करून मच्छीमारांना थेट विक्रीची संधी मिळावी, यासाठी उत्तन परिसरातील मच्छीमार संस्था आणि प्रतिनिधींनी स्वतंत्र घाऊक मासळी बाजाराची मागणी जोरदारपणे पुढे केली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

भाईंंदर : भाईंदर आणि नायगाव येथील घाऊक मासळी बाजारात दलालांची मनमानी वाढत असून, मच्छीमारांची सर्रास लूट होत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात आला आहे. दलालांच्या कात्रीतून सुटका करून मच्छीमारांना थेट विक्रीची संधी मिळावी, यासाठी उत्तन परिसरातील मच्छीमार संस्था आणि प्रतिनिधींनी स्वतंत्र घाऊक मासळी बाजाराची मागणी जोरदारपणे पुढे केली आहे.

भाईंदर पश्चिमेकडील पहाटेच्या घाऊक मासळी बाजारात मच्छीमारांना स्वतःची जागा मिळत नाही. सार्वजनिक रस्त्यावरील जागा ‘आपली मालकी’ असल्याप्रमाणे वागत दलाल मच्छीमारांना अडवतात, मासळीच्या लिलावात दलाली खातात, शिवाय काही प्रमाणात मासळीही बळकावतात. दलालांची ही साखळी पक्की असून त्यांच्या ‘नियमांनी’च व्यवहार करावे लागतात. नायगावमध्येही हीच परिस्थिती असून दलालांच्या मनमानी वेळांमुळे विशेषतः कोळी महिलांना रात्री-अपरात्री मासळी विक्रीसाठी जावे लागते.

या बाजारात महापालिकेचा वरदहस्त असल्याने दलाल, भाडेखाऊ आणि जागा अडवून बसलेले गट यांची मक्तेदारी सुरूच आहे. त्यामुळे उत्तन, पाली आणि चौक किनारपट्टीवरील मच्छीमारांना त्यांच्या हक्काचा स्वतंत्र बाजार नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची खंत व्यक्त होते.

या पार्श्वभूमीवर उत्तनमध्ये मच्छिमार संस्था, व्यापारी आणि प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मच्छिमार नेते बर्नड डिमेलो, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, मच्छिमार वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष विन्सन बांड्या, उपाध्यक्ष फ्रेडी भंडारी, सचिव डिक्सन डीमेकर, माजी अध्यक्ष माल्कम भंडारी, ऑस्टिन भंडारी, सिल्वा घावट्या, बस्त्याव भंडारी, उत्तन सोसायटीचे सचिव बोना मालू, निलेश घोंसालवीस, सारिका डुंगा आदी उपस्थित होते.

कमिशन एजंटांची मुजोरी

नायगावच्या बाजारात कमिशन एजंटांची मुजोरी इतकी वाढली आहे की ते स्वतःच बाजाराची वेळ ठरवतात. महिलांना रात्री प्रवास करावा लागतो, तर मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. संस्थांच्या संयुक्त बैठकीत एजंटांशी चर्चा करूनही त्यांनी नियम पाळण्यास नकार दिल्याने, आता बाह्य बाजारांवर अवलंबून न राहता स्वतःचे बाजार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत फेडरेशनच्या माध्यमातून ‘मार्केट समिती’ स्थापन करून स्वतंत्र घाऊक मासळी बाजार सुरू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. उत्तन, पाली आणि चौक या किनारी भागातील मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःचा स्वतंत्र घाऊक मासळी बाजार सुरू करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.दलालांच्या कात्रीतून मच्छीमारांची सुटका हा आता आमच्या हक्काच्या लढ्याचा पुढचा टप्पा आहे.

बर्नड डिमेलो, मच्छिमार नेते

logo
marathi.freepressjournal.in