

मुंबई : स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या 'वंदे मातरम' गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता 'वंदे मातरम्'चे समूहगान होणार आहे. पुढील वर्षभर याअंतर्गत सार्ध शताब्दी महोत्सवाच्या माध्यमाने राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या 'वंदे मातरम' या गीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात मंत्री लोढा म्हणाले की, वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन आणि मातृभूमीला वंदन करणारे संस्कार या गीताच्या समूह गायनातून होणार असल्याने शासकीय स्तरावरून ही शैक्षणिक संस्था आणि सरकारी आस्थापनांमध्ये 'वंदे मातरम' गीताचे समूहगान आयोजित करण्याबाबत शासकीय परिपत्रक आणि अध्यादेश जारी करण्यात आले असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.