मुंबई : मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे जीवन त्रस्त करण्याचे काम महायुती सरकार करत आहे असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त या अभियानांतर्गत राजीव गांधी भवन येथे वर्षा गायकवाड व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर टीका केली. या पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, शकील चौधरी, निजामुद्दीन राईन, अजंता यादव उपस्थित होते.