

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विशेष महासभेत गोखिवरे येथील कचरा व्यवस्थापन प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट झाला असून, बायो-मायनिंग प्रकल्पात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
महासभेत विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पुराव्यांसह आरोप करताना सांगितले की, कचऱ्यावर प्रत्यक्ष प्रक्रिया न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेकेदाराने कोट्यवधींची बिले उचलली. दरम्यान, महापालिका उपायुक्त अर्चना दिवे यांनी स्पष्टीकरण देताना जुन्या सल्लागार कंपनी टंडन अर्बन सोल्यूशनवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, या स्पष्टीकरणावर समाधान न मानता मनोज पाटील यांनी प्रशासनावर थेट सवाल उपस्थित केले.
बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींच्या बिलांना मंजुरी कशी देण्यात आली? त्यांची पडताळणी का करण्यात आली नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. प्लांट उभारणीमध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर अजीव पाटील यांनी कठोर भूमिका घेत, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील चौकशीत कोणकोणती नावे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपशील उघड करण्यासाठी विरोधी पक्षनेते मनोज पाटील लवकरच पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेत या कथित घोटाळ्याचा सविस्तर पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.