

वसई : वसई-विरार शहरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर दोन ते तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून हजारो प्रवासी ठिकठिकाणी अडकले आहेत. या कठीण परिस्थितीत उंचीने अधिक असलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली प्रवाशांसाठी एकमेव मोठा सहारा ठरत आहेत. चाकरमान्यांना ट्रॅक्टरचालकांनी परिसरानुसार गट तयार केले आहेत. ते प्रत्येक प्रवाशाकडून केवळ ५० रुपये माफक भाडे घेऊन त्यांना वसई गाव, पूर्व भाग आणि गोखीवरेपर्यंत पोहोचवत आहेत.
रेल्वे पोलीस ठाण्यात पाणी साचल्याने कामकाज बंद
वसई : वसई-विरार शहरात सलग पाचव्या दिवशी झालेल्या रेकॉर्ड ब्रेक मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहरात गेल्या २४ ते ४८ तासांपासून वीज नसल्यामुळे इमारतींमध्ये पाणी चढवता आले नाही, परिणामी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे मीरारोड ते वैतरणा कार्यक्षेत्र असलेले वसई रोड रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेले आहे. पोलीस ठाण्यात कमरेभर पाणी साचल्याने येथील कामकाज पूर्णपणे बंद असून नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. चुळणा गावातील एका नागरिकाचे पाकीट हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्याला याचा कटू अनुभव आला.