मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे ध्येय आहे. तसेच, पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. तसेच या प्रकल्पामुळे बाधित नागरिकांना पर्यायी घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.
लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल दोन मार्गिकांचा आहे. ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर जाण्यासाठी जोडमार्ग बांधण्यात येत आहे. दोन्ही बाजूला रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा मार्ग समाविष्ट आहे. सेवा मार्गाच्या कामाचा भाग म्हणून पूर्व बाजूला सोमय्या नाला पुनर्बांधणी देखील करण्यात आली आहे. या उड्डाणपुलासाठी प्रत्येकी तब्बल १,१०० मेट्रिक टन वजन आणि सुमारे १०० मीटर लांबीचे दोन गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे बांगर म्हणाले.
रेल्वे रुळावरून जाणारा १०० मीटरचा पूल समाविष्ट
घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल पालिकेच्यावतीने बांधण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळावरून जाणारा सुमारे १०० मीटरचा मुख्य पूल समाविष्ट असल्याची माहिती बांगर यांनी दिली.