
मुंबई : रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे पाच वर्षापूर्वी मुंबई महापालिका आणि रेल्वेच्यावतीने फाटक बंद करून विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी सुरू केली होती. तब्बल पाच वर्षानंतर या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.
या उड्डाणपुलामुळे पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणारी पूर्व - पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे.
विक्रोळी रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून एकूण ७ तुळ्या स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन ६५५ टन आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळ्या सुमारे २१४२ टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळ्यांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळ्या टाकण्यात आल्या आहेत. या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२ तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते मार्गिकांवरील कॉंक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा आदी सर्व पूर्ण करण्यात आली आहेत.
दोन दिवसात उर्वरीत कामे पूर्ण करणार
येत्या दोन दिवसात एका बाजूकडील ध्वनिरोधक, रंगकाम आणि पश्चिमेकडील बाजूवर मार्ग रेषा आखणी आदी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच सध्या वाहतूक बेट उभारण्यात येत आहे. वाहतूक दिवे अर्थात सिग्नल बसवायचे काम सुरू आहे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाने कळविले आहे.