
सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य वापरता यावे, यासाठी कुलाबा येथे १२ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचा हा पहिलाच प्रयोग असून यासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, पुढील दोन वर्षांत हा प्रयोग यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्याव्यतिरिक्त कामासाठी उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून नवनवीन प्रयोग राबवण्यात येतात; मात्र पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता आता सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य उपलब्ध करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य उपलब्ध व्हावे, हा मुंबई महापालिकेचा पहिलाच प्रयोग आहे. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कुलाबा, नेव्हीनगर या परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे पालिकेच्या जलविभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी सांगितले. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नवीन स्रोतांचा शोध घेतला जात असून कुलाबा येथील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.