
आम्ही या हंगामातून काही सकारात्मक बाबी घेऊन पुढच्या हंगामात जाणार आहोत. पण जी काही पोकळी निर्माण झाली आहे ती भरण्याचा प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे, असे चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
धोनी म्हणाला की, मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंह हे दोन्ही वेगवान गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत ही एक सकारात्मक बाब आहे. पुढच्या हंगामात दोन अजून वेगावान गोलंदाज संघात असणार आहेत. तसेच अजून काही खेळाडू संधी मिळण्याची वाट पाहत आहेत.
त्याने सांगितले की, मी कायम माझ्या क्रिकेटचे नियोजन केले आहे. मी माझा भारताकडून खेळलेला शेवटचा वन-डे सामना हा रांचीत होता. मला आशा आहे की टी-२० चा शेवटचा सामना हा चेन्नईत असेल. मग तो पुढच्या वर्षी असेल किंवा पाच वर्षांनी असेल.