

मुंबई : मुंबईसह राज्यातील तापमानात सतत वाढ होत असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. सोमवारी राम मंदिर येथे ३९.७, विक्रोळी येथे ३८.५ तर वांद्रे येथील पारा ३७.३ अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. पुढील दोन ते तीन दिवस पारा चढाच राहणार असल्याने हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, दोन ते तीन दिवसांनंतर आर्द्रता कमी होईल, मात्र पुन्हा एकदा उकाडा वाढेल, अशी माहिती कुलाबा हवामान विभागाने दिली.
मुंबईत उकाडा आणि दमट हवामानाचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून सोमवारीही नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. मुंबईतील अनेक भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली असून होळी नंतर पारा चढा असून मे महिन्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. उन्हाच्या तडाख्याने लोकांच्या अंगाची काहिली होत आहे. मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरांच्या घामटा निघत आहे.
दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळा...
कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा १.५ अंशांनी जास्त होते. तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. वाढलेल्या आर्द्रतेमुळे दिवसभर नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला. नागरिकांनी विशेषत: दुपारच्या वेळी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.